नाशिक : मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. मुलगा किंवा मुलगी शारीरिक विकलांग असेल, तर अडचणींमध्ये आणखीच वाढ होत जाते. या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये नुकताच झालेला सुरेश पाटील आणि रत्ना पांगारे या अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याचा विवाह वेगळा ठरावा. लोकसहभागातून आणि आसरा सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने हा विवाहसोहळा नाशिक रोडमध्ये पार पडला. त्याची सर्वत्र चर्चा आहे.
मुंबईतील कल्याणमध्ये वास्तव्य करणारे सुरेश पाटील हे अंध आणि अनाथ आहेत. पुण्यातील नसरापूर येथील रत्ना पांगारे याही अंध असून, त्या सिंगल पॅरेंट चाइल्ड आहेत. रत्ना पांगारे यांना नाशिक रोडमधील गोसावीवाडीतील आसरा सोशल फाउंडेशनचे पिंटू थोरात यांची माहिती मिळाली. त्यांनी सर्व हकीकत पिंटू थोरात यांना सांगितली. त्यानंतर पिंटू थोरात यांनी वरसंशोधनाला सुरुवात केली. अंध बांधवांच्या मदतीने सुरेश पाटील यांचे नाव पुढे आले. मुला-मुलीची पसंतीही झाली. दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दोघेही विवाहाचा खर्च करू शकत नव्हते. त्यामुळे पिंटू थोरात आणि त्यांच्या सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी आसरा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विवाह करायचे ठरवले.
पिंटू थोरात यांनी रत्ना पांगारे यांना आपली बहीण समजून स्वतःच्या घरात विवाहसोहळा करायचे ठरविले. यासाठी त्यांनी डीजे, मांडव, पाहुण्यांसाठी खानपानाची शाही लग्नासारखी व्यवस्था केली. गोसावीवाडी येथे पिंटू थोरात यांच्या घरी हळदीच्या दिवसापासूनच नाशिक रोडचे सामाजिक कार्यकर्ते, रिक्षाचालक आणि अंध बांधवांनी गर्दी केली होती. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी अकरा वाजता सुरेश पाटील यांची गोसावीवाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांना जैन भवन येथे नेण्यात आले.
हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अगदी स्वतःच्या घरातील लग्नाप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी या विवाहसोहळ्याला सहकुटुंब हजेरी लावली आणि कामही केले. पिंटू थोरात यांच्या सहचारिणी सारिका थोरात आणि आई गीताबाई बाबूराव थोरात यांनीही या विवाहात महत्त्वाची भूमिका निभावली.
रत्ना या पुण्यामधील एका खासगी शाळेत शिक्षिका असून, सुरेश पाटील हे पदवीधर आहेत. कल्याणच्या रेल्वेस्टेशनवर फिनेल, शैक्षणिक साहित्य, गृहोपयोगी साहित्य विकण्याचे काम ते करतात.
या विवाहसोहळ्याला अनेक दानशूरांनी मदत केली. विवाहासाठी उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले होते. या विवाहासाठी पिंटू थोरात यांच्यासह रत्नाकर सचिन आहेर, सचिन जाधव, हरीश भडांगे, रत्नाकर शेट्टी, सोमनाथ आढाव, किशोर खताळे, लक्ष्मण पवार, विवेक चव्हाण, रामा साळवे, सोनू बिडवे, सोमनाथ आव्हाड आणि ललित सुराणा यांनी परिश्रम घेतले.
(रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या विवाहसोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)